
बीड, 23 एप्रिल (हिं.स.)।
बीड जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुंबईत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. बीड शहरालगत घोडका राजुरी आणि काठोडा परिसरात नवीन पंचतारांकित एमआयडीसी उभारण्यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बीड जिल्हा औद्योगिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असल्याने येथे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने क्षीरसागर मागील अनेक दिवसांपासून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी पुढील आठवड्यात मंत्रालय स्तरावर तातडीने बैठक आयोजित करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. या सकारात्मक निर्णयामुळे बीडमधील सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम मिळण्याच्या आशा उंचावल्या असून जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. प्रशासकीय स्तरावर या नवीन एमआयडीसीसाठीची कार्यवाही आता अधिक वेगाने पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis