

* बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सारसबागेत प्रतिबंधात्मक आदेश काढा; प्रशासकीय अपयशाचा आंदोलकांकडून निषेध
पुणे, २६ एप्रिल (हिं.स.) : ऐतिहासिक आणि समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या सारसबाग व श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराचे पावित्र्य जपण्यासाठी आज हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. रमजानच्या काळात या परिसरात झालेल्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर, प्रशासकीय अपयशाचा निषेध करण्यासाठी आणि सारसबागेची ‘शाहीनबाग’ होऊ न देण्याचा निर्धार करत आज येथे विविध हिंदू संघटनांचे ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन’ उत्स्फूर्तपणे पार पडले. या वेळी आंदोलकांनी आगामी २७ मे रोजीच्या बकरी ईदसाठी आतापासूनच प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याची आग्रही मागणी प्रशासनाकडे केली.
२२ मार्च रोजी रमजानच्या काळात हजारोंच्या संख्येने येथे जमाव गोळा होणे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. पेशवेकालीन वारसा लाभलेल्या या पवित्र स्थळाची सुरक्षा राखण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ही सारसबाग आहे की शाहीनबाग? असा संतप्त सवाल या वेळी उपस्थित करत या घटनेमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
आंदोलनाद्वारे विविध मागण्या करण्यात आल्या. त्यामध्ये २२ मार्चच्या गर्दीला परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, आगामी काळात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.सारसबाग मंदिर परिसरात कोणत्याही बिगर-हिंदू सामूहिक कार्यक्रमांना कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी. २७ मे रोजी होणाऱ्या बकरी ईदच्या काळात सारसबागेत गर्दी, मांसाहार किंवा कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश त्वरित काढावेत. या घटना म्हणजे केवळ योगायोग नसून पद्धतशीर धार्मिक अतिक्रमणाचे संकेत आहेत, त्यामुळे शासनाने याकडे अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने पाहावे.
या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे श्री. दादा वेदक, सीए श्री. सर्वेश मेहेंदळे, पतित पावन संघटनेचे श्री. स्वप्नील नाईक, स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचचे श्री. विद्याधर नारगोलकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचचे श्री दयानंद बंडगर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांसह अनेक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देऊन, सामूहिक आरतीने आंदोलनाची सांगता करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी