
अमरावती, ३ एप्रिल (हिं.स.) : भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी माजी आमदार बच्चू कडू यांच्याविरुद्ध गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. तायडे यांच्या मते, बच्चू कडूंनी त्यांच्या भावाच्या खुनाचा कट रचल्याचा प्रयत्न केला असून यासंदर्भातील ऑडिओ रेकॉर्डिंग त्यांच्या जवळ आहे.
आरोपानुसार, निवडणुकीतील पराभवामुळे बच्चू कडूंना तायडे कुटुंबाविरुद्ध वैयक्तिक व राजकीय राग आहे आणि त्यामुळे ते षड्यंत्र रचत आहेत. तायडे यांनी पोलिसांना सखोल तपास करण्याची आणि यापूर्वी अशा प्रकारचे षड्यंत्र झाले आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तायडे यांनी स्पष्ट केले की, “मी आमदार झाल्यापासून बच्चू कडू माझ्याविरुद्ध कट रचत आहेत. अमरावतीत अशा प्रकारचे राजकारण यापूर्वी कधी झाले नाही.” तसेच त्यांनी आरोपींवर तात्काळ अटक करून संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे.
या गंभीर आरोपांमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी