

रिंग रोड भूसंपदनाचा वाद चिघळण्याची शक्यता
नाशिक, 02 मे (हिं.स.) कुंभमेळ्याच्या पार्शवभूमीवर रिंग रोडसाठी गेल्या अनेक दिवसापासून भूसंपादन प्रक्रिया सुरु आहे. भूसंपादन अखेरच्या टप्प्यात आले असताना
शनिवार (दि.२) मातोरी व मुंगसरा येथे जमीनीची मोजणी करण्यासाठी गेलेल्या भुसंपादन अधिकारी व पोलिसांनी शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.शेतकऱ्यांचा मारहाणीचा हा आरोप मात्र जिल्हा प्रशासनाने फेटाळला असून भूसंपदानाचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिंग रोड साठी २५ पैकी १९ गावांमध्ये भूसंपादनाच्या मोजणीची प्रक्रिया आटोपलेली आहे. चार गावे न्यायालयात गेले असून त्यात मातोरी, मुंगसरा या गावांचाही समावेश आहे. भूसंपदनामुळे शेतकऱ्यांचे घरे, बंगले बाधित होणार असल्याने शेतकऱ्यांनी आलायमेन्ट बदलण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच भूसंपादनविरोधात मुबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे.याप्रकरणी येत्या ४ तारखेला सुनावणी पार पडणार आहे. असे असताना जिल्हा प्रशासनाने या दोन गावामधील शेतकऱ्यांना १ मे रोजी मोबाईलवर मेसेज करून २ मेला सकाळी ९.३० वाजता भूसंपादन अधिकारी मोजणीस येणार असल्याचे सांगितले. मात्र सकाळी ७ वाजताच मोठ्या पोलिस बंदोबस्तासह भूसंपादन अधिकारी शेतकऱ्यांच्या घरी दाखल झाले. यावेळी पोलिस व अधिकाऱ्यांनी आम्हाला बळाचा वापर करीत घराच्या बाहेर काढले आणि महिलांना मारहाण केली, असा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच बळजबरीने गाडीत बसवून नाशिक तालुका पोलीस स्टेंशनला आणण्यात आले. तर महिलांना मोजणीच्या ठिकाणी पोलिसांच्या गाडीत डांबून ठेवण्यात आले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे भूसंपादनाचा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता असून प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या सर्व प्रश्नावरती बोलताना नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, शनिवारी मोजणी प्रक्रिया पार पाडण्यात येत असताना तेथील गावकऱ्यांच्या एका गटाकडून विरोध दर्शविला गेला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. ग्रामस्थांनी संघर्ष न करता सहकार्य करावे. तसेच घटनेची चौकशी केली जाईल. मोजणीप्रक्रिया आटोपणे गरजेचे असून मोजणी करणे म्हणजे ताबा घेणे वगैरे नाही, यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
तुझ्या बाबत बोलताना नाशिक तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांनी सांगितले की पोलिसांनी भूधारक गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांनादेखील घरात थांबण्याची विनंती केली. कोणालाही कोणत्याही पोलिसांकडून मारहाण झालेली नाही. मोजणीप्रक्रियेच्या कामातअडथळा आणणाऱ्या काही लोकांना तात्पुरत्या स्वरूपात प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. दुपारी साडेतीन वाजता त्यांना सोडून देण्यात आले.छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी सांगितले की, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करून गुन्हा दाखल करावा, शेतकऱ्यांच्या जमिनींचे बळजबरीने सुरू असलेले संपादन थांबवावे आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही करावी. जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.
करण पंढरीनाथ गायकर
संस्थापक अध्यक्ष, छावा क्रांतिवीर सेना
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV