
वॉशिंग्टन, 21 मे (हिं.स.)।अमेरिकेने पश्चिम आशियातील संघर्ष कायमस्वरूपी संपवण्यासाठी पाकिस्तानमार्फत नवीन युद्धविराम प्रस्ताव पाठवला आहे. अहवालानुसार, या प्रकरणाशी संबंधित राजनैतिक सूत्रांनी ही माहिती दिली आहे. इराण सध्या या प्रस्तावाचा आढावा घेत आहे. मात्र, अद्याप अधिकृत प्रतिसाद दिलेला नाही. दोन्ही बाजूंमधील मतभेद कमी करण्यासाठी मध्यस्थांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.याचदरम्यान, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी इराण दौऱ्याचे नियोजन केले आहे.
यापूर्वी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सांगितले होते की, इराण अमेरिकेसोबत प्रामाणिक हेतूने चर्चा करत आहे. मात्र, अमेरिकेबाबत त्यांना अजूनही खोल संशय आहे. इराणच्या सरकारी माध्यमानुसार, बघाई म्हणाले की इराणच्या 14 सूत्रीय प्रस्तावावर अमेरिकेचा प्रतिसाद मिळाला असून त्याचा सध्या अभ्यास सुरू आहे. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांच्या तेहरान दौऱ्याचा उद्देश दोन्ही बाजूंमधील संवाद सुलभ करणे हा आहे. बघाई म्हणाले, “सध्या आमचे प्राधान्य लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील युद्ध थांबवणे हे आहे.”
इराणने आपल्या प्रमुख मागण्यांमध्ये गोठवलेला निधी मुक्त करणे, सागरी मार्गांतील कथित अडथळे दूर करणे आणि इराणी जहाजांना लक्ष्य करणाऱ्या कारवाया थांबवण्याची मागणी केली आहे.ते पुढे म्हणाले की, तेहरान पूर्ण गंभीरता आणि सकारात्मक भावनेने चर्चा करत आहे. मात्र, अमेरिकेनेही प्रामाणिकपणा दाखवणे आवश्यक आहे. “गेल्या दीड वर्षांत वॉशिंग्टनचा इतिहास अत्यंत खराब राहिला आहे, त्यामुळे चर्चेचे वातावरण ‘गंभीर अविश्वासाने’ भरलेले आहे,” असे त्यांनी सांगितले “आमचे डोळे उघडे आहेत आणि आमचे सैन्य पूर्ण सतर्क आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, कोणत्याही प्रकारचा पूर्ण विश्वास नसतानाही इराण चर्चा सुरू ठेवेल, असे त्यांनी नमूद केले.
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांची भेट घेतली. नकवी या आठवड्यात दुसऱ्यांदा तेहरानला पोहोचले असून त्यांनी इराणचे गृहमंत्री आणि राष्ट्राध्यक्ष यांच्यासोबत चर्चा केली. अहवालानुसार, राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी नकवी यांच्यासोबतच्या बैठकीत प्रादेशिक परिस्थिती, इराण-अमेरिका अप्रत्यक्ष चर्चा आणि राजनैतिक प्रयत्नांवर चर्चा केली.
दरम्यान, इस्रायली माध्यम संस्थाने दावा केला आहे की, पाकिस्तानचा शांतता करारातील रस हा त्याच्या आर्थिक अडचणींशी संबंधित आहे. अहवालानुसार, इराण आणि पाकिस्तान यांच्यात अशी समजूत झाली आहे की, पाकिस्तान इराणला अधिक चांगला करार मिळवून देण्यासाठी मदत करेल. त्याबदल्यात इराण निर्बंधांमधील सवलत आणि संभाव्य करारानंतर मिळणाऱ्या निधीच्या माध्यमातून पाकिस्तानला त्याच्या कर्जसंकटातून बाहेर पडण्यास मदत करेल.पश्चिम आशियातील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. मात्र, अनेक देश आणि मध्यस्थ कराराच्या माध्यमातून तणाव कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode