
सैक्रामेंटो, 24 मे (हिं.स.)।कॅलिफोर्नियातील एका केमिकल फॅक्ट्रीतील खराब झालेल्या व्हॉल्व्हमुळे लाखो लोकांचे जीव आणि सहा शहरांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. ऑरेंज काउंटीमधील या फॅक्ट्रीमधून ‘मिथाइल मेथाक्रायलेट’ नावाच्या अत्यंत धोकादायक आणि सहज पेट घेणाऱ्या रसायनाची गळती होत आहे. ही बिघाडाची समस्या इतकी गंभीर आहे की गळती पूर्णपणे थांबवणे आता अशक्य झाले आहे. त्यामुळे अतिताण किंवा उष्णतेमुळे हा स्टोरेज टँक कधीही फुटू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने वेळ न दवडता सुमारे ४० हजार लोकांना तात्काळ घरे खाली करण्याचे कठोर आदेश दिले आहेत. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सध्या ते दोन अत्यंत गंभीर परिस्थितींना सामोरे जाण्याची तयारी करत आहेत.
पहिला धोका म्हणजे टँकची रचना पूर्णपणे कोसळणे. असे झाल्यास आसपासच्या पार्किंग परिसरात ६ हजार ते ७ हजार गॅलन विषारी रसायन पसरू शकते. दुसरा आणि सर्वात भीषण धोका म्हणजे प्रचंड उष्णतेमुळे टँकमधील तापमान आणि दाब वाढून मोठा स्फोट होण्याची शक्यता. जर असा स्फोट झाला, तर जवळील इंधन आणि इतर रसायनांचे टँकही आगीच्या विळख्यात सापडतील आणि ही दुर्घटना मोठ्या आपत्तीत रूपांतरित होऊ शकते.
या विषारी द्रवामुळे पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून बचाव पथक युद्धपातळीवर काम करत आहे. रसायन स्थानिक गटारांमध्ये, नद्यांमध्ये किंवा समुद्रात मिसळू नये यासाठी वाळूच्या पोत्यांच्या मजबूत भिंती उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय, आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की तापमान वाढल्यास या रसायनातून बाहेर पडणारी वाफ हवेला पूर्णपणे विषारी बनवू शकते. या वाफेच्या संपर्कात आल्यास श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांत जळजळ आणि तीव्र चुरचुर, मळमळ, उलटीची भावना आणि असह्य डोकेदुखी यांसारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
ही संपूर्ण घटना लॉस एंजेलिसपासून सुमारे ३८ मैल अंतरावरील गार्डन ग्रोव्ह शहरात घडली आहे. हा परिसर प्रसिद्ध डिज्नीलँड थीम पार्कच्या अगदी जवळ आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, अधिकाऱ्यांनी सध्या डिज्नीलँड या धोक्याच्या क्षेत्राबाहेर असल्याचे स्पष्ट केले आहे. या मोठ्या बचाव मोहिमेदरम्यान पोलिसांसमोर आणखी एक आव्हान उभे राहिले आहे. प्रशासनाच्या आदेशानंतरही सुमारे १५ टक्के नागरिकांनी आपली घरे सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे. सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या लोकांसाठी प्रशासनाने दोन मोठी निवारा केंद्रे उभारली आहेत. तसेच नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात न घालता सरकारी आदेशाचे गांभीर्याने पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode