
वसंत व्याख्यानमालेतील विशेष पुष्पाद्वारे दिली ज्ञानकुंभाची अनुभूती
नाशिक, 03 मे (हिं.स.)।
: आपले विचार हे केवळ आपल्या व्यक्तिमत्वावरच नव्हे, तर संपूर्ण जगावर प्रभाव टाकत असतात. अशा पार्श्वभूमीवर आगामी कुंभमेळा काळात कोट्यवधी दुःखी आत्मा आपल्या नगरीत येणार आहेत. ते सगळे येथुन संतुष्ट, समाधानी होऊन परतले पाहिजे. असा संकल्प आज आपण करूया, जेणेकरून आपण जगाला स्वच्छतेचा, स्वास्थ्याचा, शांती आणि सेवाभावाचा संदेश देऊ या. असे प्रतिपादन जागतिक किर्तिच्या समुपदेशक, मार्गदर्शिका व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या प्रमुख शिवानी दीदी यांनी येथे केले.
गोदाघाटावरिल देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत रविवारी (दि. 3) दिदींचे विशेष व्याख्यान झाले. त्यावेळी 'अनिश्चित समय में आंतरिक शक्ति' या विषयावर दीदींनी सुंदर निरूपण केले. तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी माऊंट आबु येथुन आलेल्या खास पथकाने आध्यात्मिक गाणी व नृत्य सादर केले.
ज्ञानपीठ मंडळाचे महाव्यवस्थापक राजेंद्रनाथ तिवारी, रश्मिताई देशमुख, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, महापौर हिमगौरी आहेर-आडके, भन्ते राहूल बोधी, बाळासाहेब सोनवणे, शेखरभाई शाह, दोंडाइचा येथील नगराध्यक्ष जितेंद्रकुमार रावल यांच्यासह पाहुण्यांच्या हस्ते अशोकराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व शिवानी दीदी यांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. शिवानी दिदींच्या पावन उपस्थितीमुळे जणु गोदाकाठी ज्ञानाचा कुंभमेळा आपण अनुभवत असल्याचे त्यांनी नमुद केले.
-----
*आजचे (दि. 4) व्याख्यान*
(सायंकाळी 7.15 वा.)
1. वक्ते : पद्मश्री डॉ. अभय बंग
विषय : आरोग्य-स्वराज्य : शंभर वर्षे जगण्याची कला.
2. श्रेयसी- संदीप- चेतन प्रस्तुत 'सूर संगम'
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV