
पर्थ, ३० मे (हिं.स.) : भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या मैत्रीपूर्ण मालिकेतील चौथ्या आणि अंतिम सामन्यात कडवी झुंज दिली. पण अखेरीस त्यांना ३-२ ने पराभव सहन लागला. आणि ही मालिका २-२ अशी बरोबरीत संपली.
भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली आणि दुसऱ्याच मिनिटाला आघाडी घेतली. नवनीत कौरने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली आणि ऑस्ट्रेलियावर सुरुवातीलाच दबाव आणला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आपली आघाडी दुप्पट केली. दीपिका सोरेंगने (२३ व्या मिनिटाला) एक शानदार गोल करून संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफच्या अखेरपर्यंत भारतीय संघाचे सामन्यावर पूर्ण नियंत्रण होते आणि मध्यंतरापर्यंत त्यांनी २-० अशी आघाडी कायम ठेवली.
यजमान ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये जोरदार पुनरागमन केले. ॲबी विल्सनने (४२ व्या मिनिटाला) पहिला गोल करून पिछाडी कमी केली, तर दोन मिनिटांनंतर ऑलिव्हिया डाउन्सने (४४ व्या मिनिटाला) २-२ अशी बरोबरी साधली.सामना शेवटच्या क्षणांपर्यंत रोमांचक राहिला, पण कोर्टनी शॉनलेने (५८ व्या मिनिटाला) निर्णायक गोल करून ऑस्ट्रेलियाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली, जी त्यांनी शेवटपर्यंत टिकवून ठेवली.
भारतीय संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला असला तरी, या दौऱ्यातून अनेक सकारात्मक गोष्टी शिकायला मिळाल्या. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर, संघाने सलग दोन सामने जिंकून उल्लेखनीय पुनरागमन केले आणि संपूर्ण दौऱ्यात प्रभावी झुंजार वृत्ती, रणनीतिक शिस्त आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले.
न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या एफआयएच नेशन्स कप स्पर्धेपूर्वी भारतीय महिला संघासाठी ही मालिका एक उत्कृष्ट तयारी ठरली आहे, ज्यामुळे आगामी आंतरराष्ट्रीय हंगामासाठी संघाचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे.
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे