
मुंबई, 11 जून (हिं.स.)। : राज्यात ‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखाली सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे काही व्यक्तींकडून बोगस जाहिराती प्रसारित करून शेतकरी, युवक व नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणीही याला बळी पडून नये, असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर, अधिकृत प्रसिद्धी माध्यमांद्वारे किंवा संबंधित कार्यालयांमार्फतच जाहीर केली जाते. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित जाहिराती, अर्जासाठी शुल्क भरण्याच्या सूचना, वैयक्तिक बँक खात्यावर पैसे जमा करण्याचे आवाहन किंवा संशयास्पद लिंक यांना बळी पडू नये.
यासंदर्भात माहिती देताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, कृषी मित्र भरतीच्या नावाखाली शेतकरी, युवक आणि नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणतीही गय केली जाणार नाही. खोट्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारित करून फसवणूक करणाऱ्या व्यक्ती अथवा संबंधितांवर कृषी विभागामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांनी अशा बोगस जाहिरातींपासून सावध राहून भरतीसंदर्भातील माहितीची खातरजमा अधिकृत माध्यमांतूनच करावी.
नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद जाहिराती किंवा संदेश आढळल्यास तात्काळ संबंधित कृषी विभागाच्या कार्यालयास अथवा स्थानिक पोलीस प्रशासनास माहिती द्यावी, असेही आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर