
बीड, 11 जून (हिं.स.)।
बीड जिल्हा प्रशासनातर्फे एक दिवसीय जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण शहरात पार पडले. आष्टी, गेवराई आणि बीड तालुक्यातील पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेले शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक, अध्यक्ष, सचिव तसेच प्रयोगशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात प्रकल्प संचालक शसुभाष साळवे म्हणाले, सध्याच्या काळात केवळ पारंपरिक शेतीवर विसंबून न राहता जलसंधारण, मृदसंधारण आणि कृषी पूरक व्यवसायांची सांगड घालणे काळाची गरज आहे. शासनाच्या महाडीबीटी
पोर्टल अंतर्गत उपलब्ध असणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभघ्यावा. तसेच, कांदा चाळ उभारणी, सूक्ष्म सिंचन (ठिबक व तुषार), कृषी यांत्रिकीकरण आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर त्यांनी विशेष भर दिला. आत्माचे प्रभारी उपसंचालक सुरज पाटील यांनी हवामान बदलाच्या अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत शेतीची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी शाश्वत शेती आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis