रत्नागिरी : फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनकडून शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे वाटप
रत्नागिरी, 14 जून (हिं.स.) । फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फणसोप-कसोप परिसरातील गरजू शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या भात बियाण्यांचे वाटप करण्यात आले. गेल्या १२ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे प
रत्नागिरी : फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनकडून शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे वाटप


रत्नागिरी, 14 जून (हिं.स.) । फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फणसोप-कसोप परिसरातील गरजू शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या भात बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

गेल्या १२ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होत असून शेती उत्पादन वाढण्यास मदत होत आहे. या उपक्रमांतर्गत रत्नागिरी तालुक्यातील कसोप, फणसोप, कुर्ली, वायंगणी आणि मागलाड या पाच गावांतील शेतकऱ्यांना भातबियाण्यांचे वितरण करण्यात आले.

गेल्या ४५ वर्षांपासून फिनोलेक्स इंडस्ट्रीज देशभरात विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहे. महिला सक्षमीकरण, शेतकरी कल्याण, बालकांचे शिक्षण तसेच समाजातील विविध घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कंपनीकडून अनेक उपक्रम राबवत आहे.

फणसोप सहकारी संस्थेचे अध्यक्ष आणि फणसोप ग्रामपंचायतीच्या सरपंच यांच्या विनंतीनुसार हा उपक्रम राबविण्यात आला. या बियाण्यांच्या मदतीने ५० एकरांहून अधिक क्षेत्र लागवडीखाली येणार असून यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे.

फणसोप विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या सौ. साळवी, सोसायटीचे मनोज साळवी, राजेंद्र साळवी, समीर साळवी, तुषार साळवी, माजी सरपंच गिरिराज साळवी यावेळी उपस्थित होते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे रावेचे विद्यार्थीदेखील उपस्थित होते.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे रामबाबू संका (डायरेक्टर टेक्निकल), सागर चिवटे (फॅक्टरी मॅनेजर), आशिष आठवले (सिनिअर ऑफिसर – लायझनिंग) आणि शामराव निंबाळकर (सीएसआर ऑफिसर) उपस्थित होते.

संस्थेकडून विविध समाजोपयोगी व शेतीविषयक अनेक उपक्रम राबविले जात जातात. मोगरा लागवड, भाजी लागवड, तसेच विविध प्रशिक्षण देण्यात येत असल्याने शेतकरी, ग्रामस्थ, सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनचे आभार मानले. हा उपक्रम शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न वाढविण्यासोबतच ग्रामीण भागातील शाश्वत विकासाला चालना देणारा ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

मुकुल माधव फाऊंडेशनच्या संस्थापिका तथा फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालिका रितू छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील शेतकरी आणि गरजू कुटुंबांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. अशा समाजोपयोगी उपक्रमांद्वारे ग्रामीण समाजाच्या सक्षमीकरणासाठी आपली बांधिलकी कायम ठेवण्याचा फाऊंडेशनचा संकल्प आहे. या प्रयत्नांमुळे शेतकरी व ग्रामस्थ यांच्यामध्ये विश्वासाची आणि समाधानाची भावना निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande