
सोलापूर, 15 जून (हिं.स.)महाराष्ट्रातील दोन प्रमुख धार्मिक स्थळे असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर आणि तीर्थक्षेत्र शेगाव यांना जोडणारी थेट रेल्वे एक्सप्रेस सेवा आषाढी वारीपूर्वी सुरू करण्यात यावी, तसेच या गाडीला ‘आनंदवारी एक्सप्रेस’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष निरज शहा आणि उदय होदाडे यांनी केली आहे.यासंदर्भात सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन सादर करण्यात आले असून ही सेवा तत्काळ आणि कायमस्वरूपी सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे.
सध्या कुर्डूवाडी मार्गे थेट रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने वृद्ध वारकरी, महिला भाविक तसेच सर्वसामान्य प्रवाशांना वारंवार गाड्या बदलाव्या लागत आहेत. एसटी बसमधील गर्दी, लांबचा प्रवास आणि वेळेचा अपव्यय यामुळे भाविकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विदर्भ आणि मराठवाडा विभागातून दर महिन्याला तसेच आषाढी वारीच्या काळात हजारो भाविक पंढरपूर येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र, पंढरपूर आणि शेगाव या दोन महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांदरम्यान थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने भाविकांना एसटी बस किंवा खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.भाविकांची वाढती संख्या आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पंढरपूर-शेगाव दरम्यान थेट रेल्वे सेवा तातडीने सुरू करून ती कायमस्वरूपी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड