
मनमाड, 15 जून (हिं.स.) उन्हाळ्याच्या तब्बल दीड महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आज, १५ जून रोजी नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची घंटा वाजली. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मनमाड, मालेगाव, नांदगावसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शाळांमध्ये 'प्रवेशोत्सव' मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.
पहिल्याच दिवशी जुन्या मित्रांची भेट आणि नवीन वर्गात झालेला प्रवेश यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.ढोल-ताशांचा गजर आणि स्वागत गीते सकाळ पासूनच सुरू होती शाळांच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांची किलबिलाट सुरू झाली होती. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तर संपूर्ण शाळा फुगे आणि तोरणांनी सजवली होती. मनमाड आणि नांदगाव परिसरातील काही शाळांमध्ये चक्क ढोल-ताशांच्या गजर करत आणि स्वागत गीते गाऊन विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. या साऱ्या वातावरणामुळे शाळांचा परिसर अतिशय भारावून गेला होता. पहिले पाऊल टाकणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना शाळेची भीती वाटू नये आणि त्यांचा उत्साह वाढावा, यासाठी शिक्षकांनी आणि शाळा प्रशासनाने विशेष तयारी केली होती. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाबाचे फूल आणि चॉकलेट देऊन त्यांचे प्रेमाने स्वागत करण्यात आले.
काही शाळांमध्ये तर चिमुरड्यांवर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. शिक्षकांकडून मिळालेल्या या अनोख्या स्वागतामुळे विद्यार्थी भलतेच सुखावले होते. शासकीय नियमांनुसार पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन वर्गातील पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. हातात नव्या कोऱ्या पुस्तकांचा सुगंध आणि पाठीवर नवीन दप्तर घेऊन विद्यार्थी उत्साहाने आपआपल्या वर्गात बसले होते. पहिल्या दिवशी अभ्यासाचा कोणताही ताण न देता शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, सुट्टीतील त्यांच्या गमतीजमती ऐकून घेतल्या आणि त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.आजच्या या यशस्वी प्रवेशोत्सवामुळे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अतिशय सकारात्मक आणि उत्साही वातावरणात झाली असून, पालकांनी देखील शाळांच्या या उपक्रमाचे मोठे कौतुक केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV