
पुणे, 15 जून (हिं.स.)शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील जाचक अटी हटविण्याच्या मागणीवरून अन्नत्याग आंदोलन स्थगित केल्यानंतरही आमदार रोहित पवार यांनी सरकार विरोधातील आपली भूमिका कायम ठेवली आहे. सरकारला आणखी काही दिवसांची संधी देत त्यांनी पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, सरकारला चर्चेच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी वेळ दिला जात आहे. मात्र, कर्जमाफीतील जाचक अटी कायम राहिल्यास मराठवाड्यात व्यापक जनआंदोलन उभारले जाईल.त्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर तडजोड केली जाणार नाही. सरकारने वेळेत निर्णय घेतला नाही तर शेतकरी आणि विविध संघटनांना सोबत घेऊन मोठा लढा उभारला जाईल.
दरम्यान, सरकारशी चर्चा सुरू असली तरी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होणे आवश्यक असल्याचे रोहित पवार यांनी अधोरेखित केले. त्यामुळे पुढील काही दिवसांत सरकारची भूमिका आणि निर्णय याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु