
नाशिक, 14 जुलै (हिं.स.)। जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक आजपासून दोन दिवसीय बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सुरुवात झाली.
समितीचे अध्यक्ष, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार भास्कर भगरे, महापौर हिमगौरी आडके, आमदार नितीन पवार, आमदार सरोज अहिरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिकचे प्रकल्प संचालक महेश पाटील तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत कृषी विभागांतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजना, परंपरागत कृषी विकास योजना, मृदा आरोग्य पत्रिका, ई-राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम), प्रधानमंत्री फसल विमा योजना, कृषी पायाभूत सुविधा निधी योजना, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी क्लिनिक व कृषी व्यवसाय केंद्र योजना, किसान कॉल सेंटर, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पीडीएमसी) तसेच पीएम-किसान या योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यातील प्रत्येक गावातील पिकनिहाय मातीचा नमुना घेवून पीकसुधारीसाठी परिक्षण करण्यात यावे. शेतकऱ्यांना जैविक व सेंद्रीय खतांच्या वापरास प्रोत्साहन द्यावे. E- NAM योजनेचा राष्ट्रीय कृषी बाजार समित्या व शेतकऱ्यांना अधिकाधिक आंतराष्ट्रीय पातळीवर लाभ होण्यासाठी जनजागृती करण्यात यावी. आत्माद्वारे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारे अभ्यास परदेश दौरे आयोजित करतांना जास्तीत जास्त प्रयोगशील शेतकऱ्यांसह महिला शेतकऱ्यांचाही समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीत प्रत्येक विभागाकडून योजनानिहाय भौतिक व आर्थिक प्रगती, निधी खर्च, लाभार्थ्यांची स्थिती, प्रलंबित बाबी तसेच अंमलबजावणीतील अडचणींची माहिती सादर करण्यात आली. त्यावर समितीचे अध्यक्ष खासदार श्री. वाजे आणि समिती सचिव तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देत केंद्र शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी, पारदर्शक आणि कालबद्ध अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या. खासदार डॉ. बच्छाव, खासदार श्री. भगरे यांनी विविध सूचना केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV