




दिल्लीतील ‘चलो संसद’ आंदोलनाला हिंसक वळण
लाठीचार्ज, अश्रुधूर, ताब्यात घेण्याच्या कारवाईने तणाव वाढला
महाराष्ट्रातही विद्यार्थ्यांचा संताप
नवी दिल्ली, 20 जुलै (हिं.स.)। शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटीच्या घटनांविरोधात कठोर कारवाई करावी, तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची सुटका करावी या मागण्यांसाठी रविवारी देशभरात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले. कॉकरोच जनता पार्टीच्या आवाहनानंतर नवी दिल्लीतील जंतर-मंतर हे आंदोलनाचे मुख्य केंद्र ठरले. दिल्लीसह महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, यवतमाळ तसेच लडाखमधील लेह आणि कारगिल येथेही विद्यार्थी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. दिल्लीतील आंदोलनाला रोखण्यासाठी पोलिसांनी सकाळपासूनच कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. आंदोलक संसदेकडे निघाल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला.
सोनम वांगचुक यांना ताब्यात घेऊन सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जंतर-मंतर परिसरात रात्रभर ठिय्या आंदोलन सुरू ठेवले होते. सोमवारी सकाळी त्यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आंदोलनाची सूत्रे हाती घेतली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नवी दिल्ली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले. पोलिसांनी आंदोलन बेकायदेशीर असल्याचे सांगत परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले, मात्र आंदोलकांनी संसदेकडे कूच करण्याचा निर्धार कायम ठेवला.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी संसद मार्गावरील लोखंडी बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न केल्याने पोलिस आणि आंदोलक आमनेसामने आले. संसदेपासून अवघ्या काहीशे मीटर अंतरावर दोन्ही बाजूंमध्ये मोठा संघर्ष झाला. या वेळी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर केला. अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा करण्यात आला असून काहींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचेही सांगण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड्सना स्पर्श केल्यानंतर करंट बसल्याचा आरोपही केला आहे. मात्र या आरोपांवर पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
कॉकरोच जनता पार्टीने गीतांजली आंगमो यांना केसाला धरून खेचल्याचा तसेच महिला आणि विद्यार्थ्यांशी गैरवर्तन झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून अभिजित दिपके यांनाही सुरुवातीला ताब्यात घेतल्याची चर्चा होती. मात्र नंतर त्याचा इन्कार करण्यात आला. दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर अभिजित दिपके यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केल्याची माहिती देण्यात आली.
दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी परिसरातही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी लाठीमार झाल्याचे तसेच अनेक विद्यार्थी, महिला आणि समर्थकांना ताब्यात घेतल्याचे समोर आले. एका महिलेला तिच्या लहान मुलासह ताब्यात घेतल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. दरम्यान, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना, सोनम वांगचुक यांची तातडीने सुटका आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांवर निर्णायक कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली असून, सरकारने या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी देशभरातून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule