
* धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक
नवी दिल्ली, 26 जुलै (हिं.स.) : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त महत्वाचा आहे. आमची युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यातून हेच दिसतं, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली आहे.
नीट पेपर फुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आहे. दिल्लीत जंतर-मंतरवर मागच्या महिन्याभरापासून आंदोलन सुरु होतं. सोमवारी सीजेपीने संसेदवर काढलेल्या मोर्चानंतर परिस्थिती चिघळली. हळूहळू हे आंदोलन देशव्यापी बनलं. अखेर सरकारला काल त्यांचा राजीनामा घ्यावा लागला. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.
शाहांनी म्हटले की, मोदी सरकार देशातील युवकांच्या भावनांचा सन्मान करते. पेपर लीक विरुद्ध आवश्यक सुधारणांसाठी कटिबद्ध आहे. पेपर लीक प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. यासाठी पीएम मोदी यांनी चांगले निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे NEET परीक्षेत यशस्वी ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल हा माझा विश्वास आहे.
शिक्षण मंत्री म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही अमित शाह यांनी कौतुक केलं. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या कार्यकाळात राष्ट्रीय शिक्षण नितीचं प्रभावी क्रियान्वयन, मातृभाषेत परीक्षा व्यवस्था, पीएम श्री विद्यालयांचा विस्तार, डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन, कौशल विकास उद्योग-अकादमिक समन्वय भक्कम करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण सुधारणा केल्या असं अमित शाह म्हणाले. परीक्षा प्रणाली समावेशक आणि विद्यार्थी केंद्रीत बनवण्यासाठी सुद्धा त्यांनी उल्लेखनीय प्रयत्न केले, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी