
बंगळुरु, 26 जुलै (हिं.स.)कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले आहे की ते २०२८ ची विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. त्यांनी एका विस्तृत संदेशातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, आता त्यांचे वय वाढले असून पूर्वीपेक्षा त्यांच्यात ऊर्जा कमी झाली आहे आणि त्यामुळे, त्यांना पुढील निवडणूक लढवण्याची इच्छा नाही.
सिद्धरामय्या लिहितात, आज राजकारणाचे क्षेत्र पूर्णपणे भ्रष्ट झाले आहे. त्यामुळे, मी २०२८ ची विधानसभा निवडणूक उमेदवार म्हणून लढवणार नाही. पण, राजकारणात सक्रिय राहून, मी जनतेच्या सुख-दुःख आणि समस्यांसाठी आवाज बनून काम करत राहीन. वरुणा विधानसभा मतदारसंघातील जनता माझ्यावर पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी दबाव टाकत आहे. पण, मी भविष्यात कोणतीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी, जेव्हा मी निवडणूक लढवली, तेव्हा मतदारसंघातील जनतेने मला आर्थिक पाठिंबा देऊन माझा विजय निश्चित केला. पण आता तसे होत नाही.
माजी मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मी आता ७९ वर्षांचा आहे. आमच्या सरकारचा कार्यकाळ अजून दीड वर्ष बाकी आहे. तोपर्यंत मी ८१-८२ वर्षांचा होईन. माझे आरोग्य आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. त्याच ऊर्जेने आणि उत्साहाने काम करणे आता शक्य नाही. २०२८ पर्यंत मी ८२ वर्षांचा होईन, आणि माझ्या राजकीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण होतील.
आपल्या सुरुवातीच्या प्रवासाविषयी सिद्धरामय्या म्हणतात, मी माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९७८ मध्ये तालुका बोर्ड सदस्य म्हणून केली. मी पराभव आणि विजय दोन्ही अनुभवले आहेत. पण मला समाधान आहे की मी कधीही माझ्या तत्त्वांच्या विरोधात वागलो नाही किंवा माझ्या सदसद्विवेकबुद्धीशी तडजोड केली नाही. आता अशी वेळ आली आहे की निवडणुका लढवण्यासाठी लोकांना पैसे द्यावे लागतात. राजकारण पूर्णपणे भ्रष्ट झाले आहे. प्रामाणिक राजकारणाला आता जागाच उरलेली नाही असे दिसते. या पार्श्वभूमीवर, मी भविष्यात निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे