
सोलापूर, 28 जुलै (हिं.स.)। श्री स्वामी समर्थांच्या पवित्र नगरी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात बुधवार, दि. २९ जुलै रोजी होणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे.
गुरुपौर्णिमेला श्री वटवृक्ष मंदिरात विशेष धार्मिक महत्त्व असून, देशभरातून हजारो भाविक श्री स्वामी समर्थांना आपले सद्गुरू मानून दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये दाखल होतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंदिर परिसरात मोठी गर्दी अपेक्षित असल्याने दर्शन व्यवस्था अधिक सुलभ करण्यात आली आहे.
मंदिरात पहाटे ४ वाजता नित्यनियमाप्रमाणे काकड आरती होणार आहे. मात्र, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंदिर पहाटे २ वाजताच दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.
मंदिर प्रशासनाने भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी पूर्ण केली असून, गुरुपौर्णिमेच्या दिवशी नित्यनियमाने होणारे वैयक्तिक अभिषेक होणार नसल्याची माहितीही देण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड