
परभणी, 27 ऑगस्ट (हिं.स.)।
पूर्णा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 111 आणि खासगी व्यवस्थापनाच्या 43 अशा एकूण 154 शाळांनी अन्नसुरक्षा नोंदणी करणे बंधनकारक असून, प्रत्येक शाळेने ही नोंदणी पूर्ण करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी कृष्णा मुळे व वैभव ठोंबरे यांनी दिले. अभिनव विद्याविहार प्रशालेत तालुक्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अन्नसुरक्षा, अन्नाची गुणवत्ता तसेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मुख्याध्यापकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेस तालुक्यातील 154 शाळांचे मुख्याध्यापक तसेच सर्व केंद्रांचे केंद्र समन्वयक उपस्थित होते. कार्यशाळेच्या प्रास्ताविकात ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी कापसीकर यांनी योजनेच्या अंमलबजावणीतील विविध बाबींवर प्रकाश टाकला. गटशिक्षणाधिकारी किरण सुरोडवार यांनी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोरपणे राबविण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी कृष्णा मुळे व वैभव ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या पोषण आहाराची गुणवत्ता, स्वच्छता, सुरक्षितता आणि पौष्टिकता याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोषण आहार तयार करण्यापासून तो विद्यार्थ्यांना वितरित करण्यापर्यंत आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक शाळेने अन्नसुरक्षा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. कार्यशाळेचे नियोजन तालुका विभागप्रमुख राहुल धोंडगे यांनी केले. कार्यशाळेमुळे मुख्याध्यापकांना अन्नसुरक्षा नियम, पोषण आहाराची गुणवत्ता आणि योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आवश्यक मार्गदर्शन मिळाले
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis