राजस्थानमधील जनतेने भाजपच्या विकासाला कौल दिला - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
* दहा पैकी आठ महापालिकांचे महापौर भाजपचे होणार, विरोधकांना जनतेने नाकारले नागपूर, १५ सप्टेंबर (हिं.स.) : राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांनी पराभव स्वीकारला असून, जनतेने त्यांना नाकारले आहे. जनतेने विरोधकांना पराभूत करून
बावनकुळे


* दहा पैकी आठ महापालिकांचे महापौर भाजपचे होणार, विरोधकांना जनतेने नाकारले

नागपूर, १५ सप्टेंबर (हिं.स.) : राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांनी पराभव स्वीकारला असून, जनतेने त्यांना नाकारले आहे. जनतेने विरोधकांना पराभूत करून भाजपच्या विकासाच्या भूमिकेला कौल दिला आहे. ३१८ महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींपैकी तब्बल २३९ ठिकाणी भाजपची सत्ता येईल, असा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. त्यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

भाजपला मोठा विजय मिळणार असून, दहा पैकी आठ महानगरपालिकांचे महापौर भाजपचे होतील. बिकानेर आणि अजमेर या दोन ठिकाणी भाजप थोड्या मतांनी मागे असल्याचेही त्यांनी सांगितले.

राजस्थानच्या निकालावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसने ‘झेन झी’ आणि युवकांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसकडून आपला प्रचारासाठी गैरवापर करून घेतला जात असल्याचे युवकांच्या लक्षात आले. जनतेची दिशाभूल करून मतप्रवाह बदलण्याचे काँग्रेसने अनेक प्रयत्न केले; मात्र त्यात त्यांना यश आले नाही. राजस्थानमध्ये भाजपला मोठा विजय मिळाला आहे.

राजस्थानमधील भाजपच्या विजयावरून विरोधकांवर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, ‘वंदे मातरम्’ पूर्ण म्हणणार नाही, अशी काँग्रेसची भूमिका असल्याने ‘झेन झी’मध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे युवक काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडले नाहीत, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

जरांगे यांच्या मुंबई आंदोलनावर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाबाबत विचारले असता, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

दिशा सालियन प्रकरणावर अधिक भाष्य टाळले

दिशा सालियन प्रकरणाबाबत विचारले असता, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका बावनकुळे यांनी मांडली.

चौकशीतून सत्य समोर येईल

संजय राऊत यांच्या संदर्भातील प्रश्नावर बावनकुळे म्हणाले की, चौकशीतून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईल. चौकशीतून जे सत्य आहे, ते समोर येईल.

कल्याण जमीन प्रकरणाचा अहवाल विधानसभेत मांडणार

कल्याणमधील प्रीमियर लँड जमीन प्रकरणाबाबत बावनकुळे म्हणाले की, या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आल्याची घोषणा आपण विधानसभेतच केली होती. या प्रकरणातील चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्याबाबत विधानसभेत स्पष्टीकरण देण्यात येईल. नाना पटोले यांनीही हा मुद्दा विधानसभेत मांडला होता, त्यामुळे चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्यावर योग्य ती माहिती सभागृहात दिली जाईल.

देशात समान नागरी कायदा आवश्यक

समान नागरी कायद्याबाबत बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. देशात समान नागरी कायदा लागू होणे आवश्यक आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाले पाहिजेत, असे ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande