'गोकुळ'साठी मुख्यमंत्री फडणवीस हेच महायुतीचे नेते : माजी संचालक युवराज पाटील यांचे पत्रक
कोल्हापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीचे पॅनेल तयार करण्याचे अधिकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनाच आहेत, हे कुणीही नाकारलेले नाही. परंतु; ते पक्ष
गोकुळ दूध संघ


कोल्हापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)।

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीचे पॅनेल तयार करण्याचे अधिकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनाच आहेत, हे कुणीही नाकारलेले नाही. परंतु; ते पक्षनिहाय संख्याबळावर व्हावे, अशी आम्हा तिन्ही पक्षांची भावना आणि मागणी आहे, असे स्पष्टीकरण गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील- बापू यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

युवराज पाटील यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे, आमचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन दिवसांपूर्वी एक पत्रक प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये वास्तविक त्यांनी न्यायालयीन लढाईमध्ये पात्र ठरलेल्या १४०० दूध संस्थांच्या न्यायालयीन लढ्याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले होते. कारण; या संस्थांच्या पात्र होण्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करीत होता. दरम्यान, या विषयाची नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्यासाठी पत्रक काढण्यात आले. तर मग या आकडेवारीमुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मिरचीचा एवढा ठसका का लागला? हे कोडे गुलदस्त्यातच आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे, नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलेली ती आकडेवारी जर वस्तुस्थितीला धरून नसेल, तर त्या विषयासंदर्भात चर्चा व्हायला काहीच हरकत नव्हती. त्या बातमीत भारतीय जनता पक्षाचे किती ठराव आहेत, याबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांनी कुठेही काहीही म्हटलेले नव्हते.

१४०० मध्ये ८० टक्के संस्था राष्ट्रवादी, शिवसेना- शिंदे गट, व जनसुराज्य पक्षांच्या : युवराज पाटील

पत्रकात म्हटले आहे, अदृश्य शक्ती म्हणजे मुख्यमंत्री नव्हेत. कारण; मुख्यमंत्र्यांचा याच्याशी काडीमात्रही संबंध नाही. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांना मध्ये पाडून राजकारण कुणीही करू नये, अशी आमची नम्र विनंती आहे. ज्यांनी न्यायालयात १४०० हून अधिक दूध संस्थांना अपात्र करण्यासाठी प्रयत्न केला, त्यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना - शिंदे गट आणि जनसुराज्य पक्ष यांना एकत्र आणले. कारण; यातील ८० टक्क्यांहून अधिक दूध संस्था या तिन्ही पक्षांच्याच आहेत. हे तिन्हीही महायुतीमधीलच घटक पक्ष आहेत. आपल्या मित्रपक्षांच्याच संस्था मतदार यादीतूनच काढण्यामागे हेतू काय आहे, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, या न्यायालयीन लढाईमुळे सर्वांनी एकत्र येऊन या संस्था वाचवण्याचा सांघिक प्रयत्न झाला आणि त्यातूनच ही संघटना अधिक बळकट झाली. या सर्व संस्थांना एकत्र आणण्याचे महत्त्वाचे काम या अदृश्य शक्तीने केलेले आहे. त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभारच मानतो. कारण; अदृश्य शक्तींमुळेच अन्यायाविरुद्ध लढण्याची ही एक वज्रमूठ तयार झाली. शपथा आणि आणाभाकाही झाल्या. त्यामुळेच या संस्था वाचवण्याचा प्रयत्नही झाला आणि त्यामध्ये परमेश्वराने आम्हाला यशही दिले. त्यामुळे आम्ही परमेश्वराचेही आभार मानतो. कारण; यामध्ये विजय हा सत्याचाच झालेला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande