
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर (हिं.स.)। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अमेरिकेच्या टॅरिफ आणि व्यापार धोरणावरून केंद्र सरकारवर टीका केली. सरकार अमेरिकेच्या दबावापुढे झुकत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचा फटका देशातील १४० कोटी नागरिक, शेतकरी आणि उद्योगांना सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले.
खरगे यांनी बुधवारी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, भारतीय वस्तूंवर अमेरिकेकडून १०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याची अलीकडील धमकी ही सरकारच्या परराष्ट्र आणि व्यापार धोरणांच्या अपयशाचे द्योतक आहे. आधी २५ टक्के, त्यानंतर ५० टक्के आणि आता १०० टक्के टॅरिफचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे देशातील औषध उद्योग, कापड, अभियांत्रिकी वस्तू, रसायने, ऑटो कंपोनंट्स, रत्ने व आभूषणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना मोठा फटका बसू शकतो.
काँग्रेस अध्यक्षांनी आरोप केला की, एका बाजूला भारतीय वस्तूंवर मोठ्या आयात शुल्काचा धोका निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे मोदी सरकारने अशा व्यापार आराखड्याला सहमती दर्शवली आहे, ज्यामुळे भारतीय कृषी क्षेत्रात अमेरिकन उत्पादनांचा प्रवेश सुलभ होणार आहे. खरगे यांनी हा देशातील शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणारा निर्णय असल्याचे म्हटले. या व्यापार कराराअंतर्गत भारताला पुढील पाच वर्षांत ५०० अब्ज डॉलरच्या अमेरिकन वस्तू खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
खरगे यांनी यूपीआयवरील मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर)च्या मुद्द्याचाही उल्लेख केला. हा सरकारच्या कमकुवतपणाचा ताजा पुरावा असल्याचे त्यांनी म्हटले. टॅरिफ आणि व्यापारापासून एच-१बी व्हिसा तसेच डिजिटल पेमेंटपर्यंतच्या विविध मुद्द्यांवर वॉशिंग्टनचा दबाव सातत्याने वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule