
मुंबई, 20 सप्टेंबर (हिं.स.)। मान्सूनने राजस्थानच्या काही भागांतून माघार घेण्यास सुरुवात केली असून, आगामी तीन ते चार दिवसांत राजस्थान, पंजाब तसेच सौराष्ट्र-कच्छच्या आणखी काही भागांतून मान्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू होण्यासाठी हवामान अनुकूल राहण्याचा अंदाज आहे. मात्र, एकीकडे मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला असतानाच दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीचा प्रभाव विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात जाणवणार असून, या भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मान्सूनने यंदा दोन दिवस उशिराने म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून माघार घेतली. साधारणपणे १७ सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. आगामी काही दिवसांत राजस्थानसह पंजाब आणि सौराष्ट्र-कच्छच्या काही भागांतूनही मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे. त्याचवेळी उत्तर अंदमान समुद्र आणि परिसरात वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली असून, त्याच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पुढील काही दिवसांत अधिक तीव्र होऊन पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर होण्याचा अंदाज आहे.
या हवामान बदलाचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. २० ते २५ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्र आणि गोवा परिसरात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनीही या कालावधीत राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा असलेल्या अंतर्गत भागांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
येत्या 21 ते २२ सप्टेंबरदरम्यान सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. २१ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातही मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अहिल्यानगरसह मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. २२ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. तसेच २३ सप्टेंबरपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, २१ ते २८ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या हंगामातील हा अंतिम टप्पा मानला जात असून, या पावसामुळे काही दिवसांपासून कोरड्या हवामानाचा सामना करणाऱ्या भागांना दिलासा मिळू शकतो. पिकांसाठीही हा पाऊस महत्त्वाचा ठरणार असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule