पुणे, 11 ऑक्टोबर, (हिं.स.)। सर्व क्षेत्रात ब्राह्मण समाजाने चांगले काम केले आहे. ते जेथे जातील तेथे लोकांसोबत सलोख्याचे संबंध निर्माण करतात. या समाजातील बेरोजगार युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवृत्त कॅप्टन आशिष दामले यांची नियुक्ती केली आहे. या महामंडळाला निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा लाभ घेऊन युवकांनी उद्योग व्यवसाय उभारून देश विकासात हातभार लावावा असे आवाहन विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी केले.
विप्र फउंडेशन च्या वतीने प्राधिकरण आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात ब्राह्मण समाजातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने दिवाळी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) निवृत्त कॅप्टन आशिष दामले यांचा पुणेरी पगडी, शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार उमाताई खापरे, अमित गोरखे, माजी महापौर योगेश बहल, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, राष्ट्रीय विप्र महासंघ अध्यक्ष सुभेदार तिवारी, समन्वयक अनिल शर्मा, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस न्यू दिल्ली अध्यक्ष प्रमोद भावसार, सीमा जोशी, ब्राह्मण नारी एकता मंच अध्यक्ष संजीवनी पांडे, सुनील कौशिक, नवीन शर्मा, रवींद्र कौशिक, हरि शर्मा, लवकांत शर्मा, वैभव मोरे आदींसह समाजातील बहुसंख्य बंधू-भगिनी उपस्थित होते. यावेळी शिवानी भारद्वाज व दीपिका शर्मा यांनी भजन सादर केले. तसेच परशुरामाच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली.
सत्काराला उत्तर देताना कॅप्टन आशिष दामले यांनी सांगितले की, ब्राह्मण समाज हा सहिष्णू समाज आहे. पौरोहित्य करणाऱ्या कुटुंबातील युवकांना रोजगाराच्या समस्या आहेत. आता परशुराम आर्थिक विकास मंडळास भरघोस निधी मिळाला आहे. युवकांनी स्टार्टअप सुरू केल्यास १५ लाख रुपयांचा व्याज परतावा, भागीदारीत केलेल्या व्यवसायासाठी ५० लाख रुपयांचा व्याज परतावा आणि देशांतर्गत शैक्षणिक कर्जासाठी १० लाख आणि परदेशातील शैक्षणिक कर्जासाठी २० लाख रुपयांचा व्याज परतावा महामंडळाच्या वतीने देण्याचे नियोजन करणार आहे. त्याचा युवकांनी लाभ घेऊन सक्षम व्हावे. जयपूर येथे उभारण्यात आलेल्या परशुराम भवन प्रमाणे राज्यातील सर्व विभागात परशुराम भवन उभारले जावे यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. कल्याण डोंबिवली येथे जागा मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. महामंडळाच्या निर्मितीच्या नऊ महिन्यांतच पुण्यात पहिले ब्राह्मण भवन कार्यालय सुरू झाले आहे. भगवान परशुरामांचे नाव कुठेही कमी होऊ देणार नाही. तर समाजाचा अभिमान आणि स्वाभिमान जपला जाईल असे कार्य या महामंडळाच्या वतीने करण्याचा विश्वास दामले यांनी यावेळी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु