कोल्हापूर, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली असून गेल्या अनेक वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या बँक खात्यांवरील रक्कम परत मिळविण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात तब्बल 4 लाख 73 हजार 270 निष्क्रिय खात्यांमध्ये 136 कोटी रुपये पडून आहेत. ही खाती मागील 10 वर्षांपासून व्यवहारविरहित असल्याने संबंधित रक्कम डीईए (Depositor Education and Awareness) फंडात हस्तांतरित करण्यात आली आहेत. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या (MoF) वित्तीय सेवा विभागाच्या (DFS) निर्देशानुसार राज्यस्तरीय बँकर्स समिती (SLBC) आणि सर्व बँकांच्या सहकार्याने 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या कालावधीत जिल्हाभरात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या निष्क्रिय खात्यांवरील रक्कम परत मिळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
या अंतर्गत 15 व 16 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहून नागरिकांकडून आवश्यक कागदपत्रे स्वीकारतील. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड व अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो सादर करावयाचा आहे. खातेदाराचा मृत्यू झाल्यास, नामनिर्देशित व्यक्तींनी संबंधित शाखेशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नागरिकांसाठी “Udgam” हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे, ज्यावर आपल्या न वापरलेल्या खात्यांवरील रकमेची माहिती https://udgam.rbi.org.in/unclaimed-deposits/#/login या संकेतस्थळावर सहज पाहता येते.
आपले पैसे सुरक्षित आहेत, घाबरु नका, असा संदेश लीड बँकेच्या व्यवस्थापकांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar