रस्ता सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी — राघवेंद्रसिंह
पुणे, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास ‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे राघवेंद्रसिंह यांनी मंगळवारी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत रस्ता सुरक्षा आणि हेल्मेट वापर या विषय
rast


पुणे, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास ‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे राघवेंद्रसिंह यांनी मंगळवारी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत रस्ता सुरक्षा आणि हेल्मेट वापर या विषयांवर संवाद साधला. प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी त्यांचे स्वागत केले.

या प्रसंगी लेफ्टनंट कर्नल विवेक तिवारी, सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल मोहित गौर, Jobizza चे संस्थापक डॉ. गौरव शर्मा, आयटी व्यावसायिक पवनकुमार द्विवेदी, विद्यापीठातील प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राघवेंद्रसिंह यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना सांगितले की, “दररोज हजारो विद्यार्थी दुचाकीवरून प्रवास करतात. त्यामुळे हेल्मेटचा वापर ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक बाब आहे. रस्ता सुरक्षा ही केवळ वैयक्तिक नाही, तर सामूहिक जबाबदारी आहे. ‘सेल्फ डिसिप्लिन हीच खरी सेफ्टी’ हा संदेश आपण सर्वांनी मनात ठेवावा.”

त्यांनी सांगितले की, २०१४ मध्ये ग्रेटर नोएडामध्ये त्यांच्या एका जिवलग मित्राचा अपघातात मृत्यू झाला होता. त्या वेळी त्याने हेल्मेट घातलेले नव्हते. या घटनेने प्रेरित होऊन त्यांनी हेल्मेट वितरण आणि रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम सुरू केली. आजपर्यंत त्यांनी २२ राज्यांमध्ये सुमारे ७५,००० हेल्मेट मोफत वाटले असून, देशभरात रस्ता सुरक्षिततेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

या उपक्रमाचे कौतुक करत प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर म्हणाले, “विद्यार्थ्यांनी अशा समाजोपयोगी उपक्रमांमधून प्रेरणा घ्यावी आणि रस्ता सुरक्षा हा स्वतःचा संकल्प मानावा.”

राघवेंद्रसिंह हे भारतीय लष्कर व नेव्ही मुख्यालय, नवी दिल्ली येथे ‘रोड सेफ्टी ब्रँड अॅम्बेसेडर’ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या ‘मिशन सेफ इंडिया’ अंतर्गत देशातील २४ राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालये आणि कंपन्यांमधून जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. तसेच त्यांनी आयोजित केलेल्या ‘सुरक्षा यात्रा’, ‘सेवाक्रांती अभियान’ आणि ‘शिव शिष्य परिषद’ सारख्या उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

राघवेंद्रसिंह यांच्या कार्याची दखल ‘इंडियन आयडॉल’, ‘मिस इंडिया’, तसेच अनेक राष्ट्रीय पुरस्कारांद्वारे घेण्यात आली आहे. त्यांच्या कार्यातून युवकांमध्ये रस्ता सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारीची भावना दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande