अमरावती, 22 ऑक्टोबर (हिं.स.) : डिजिटल पेमेंट, ऑनलाईन अकाऊंटिंग सॉफ्टवेअर, विविध मोबाईल अॅप्स आणि ए.आय.च्या जमान्यातही व्यापार्यांमध्ये अजूनही चोपडीचे महत्त्व टिकून आहे. कागद, शाई आणि पारंपरिक पद्धतीने लिहिलेली ही हिशेबवही कोल्हापूरसह अनेक बाजारपेठांमधील पेढींवर व्यापार्यांच्या टेबलावर पाहावयास मिळते.
चोपडी म्हणजे हिशेबाची वही. लाल रंगाचे कापडी कव्हर असलेल्या या वहीमध्ये खरेदी, विक्री, येणी, देण्यांपासून उधारीपर्यंत सर्वांचा हिशेब हाताने स्वच्छ लिहिलेला असतो. दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर व्यापारी, अडते या चोपडीचे पूजन अतिशय मनोभावे करतात. लक्ष्मीपूजन दिवशी या नवीन चोपडीचे पूजन करत पुढच्या वर्षाच्या हिशेबाला तयार करतात. चोपडी केवळ हिशेब लिहिण्याची वही नसून व्यापार्यांचे ते एक विश्वासाचे प्रतीक आहे. त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढले जाते, त्यानंतरच ती वापरात घेतली जाते. त्यामुळे या चोपडीला धार्मिक परंपरा देखील आहे. चोपडी लिहिणार्याचे अक्षर देखील मोत्यासारखे असते. वीज, इंटरनेट, पासवर्ड किंवा तांत्रिक अडचणीशिवाय काम या पारंपरिक चोपड्या आजही आर्थिक व्यवहाराच्या साक्षीदार आहेत.
खातेवाही : व्यापार्याचे नाव, त्याला दिलेला माल आणि रक्कम याची नोंद यात असते.
रोजकिर्द : रोजच्या जमा खर्चाची नोंद यामध्ये ठेवण्यात येते.
मापतिपडी : लिलावात घेतलेल्या मालासंबंधीच्या सर्व नोंदी यात असतात.
बिल बुक : कोणाकडून माल घेतला, किती दिवस राहिला, कोणत्या
व्यापर्याला कितीला दिला याची नोंद
शेतकरी पट्टी बुक : लिलावात माल लावलेल्या शेतकर्याचे नाव,
मालाची संख्या, दर आणि सर्व हिशेब करून शेतकर्याला
दिल्या जाणार्या पट्टीची नोंद असते.
संगणकातील डेटा गेला, सर्व्हर बंद झाला तरी आमची चोपडी कधीच बंद पडत नाही. पूर्वी दहा वर्षांपर्यंत चोपड्या ठेवत असत, आता सात वर्षे चोपडी ठेवतो. चोपड्यांमध्ये देखील आता खातेवही आणि रोजकिर्द या दोन वह्या राहिल्या आहेत. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी व्यापार्यांसाठी चोपडी म्हणजे विश्वासाचं बँक खातेच असते.
नितीन कर्डक अडत व्यापारी, बाजार समिती,अमरावती
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी