
सोलापूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर होणार असलेल्या भाजपमधील ‘इनकमिंग’मुळे जुन्या कार्यकर्त्यांवर पक्षाच्याच कार्यालयासमोर धरणे धरण्याची वेळ आली. मुख्यमंत्र्यांसह पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाने काँग्रेसमुक्तीऐवजी भाजपच काँग्रेसयुक्त बनत आहे.अन्य पक्षातील नेत्यांना पक्षाची कवाडे उघडण्याचा निर्णय घेण्यास भाजपचे स्थानिक नेतेही तितकेच जबाबदार आहेत. विशेषतः देशमुख आमदराद्वयींतील गटबाजी, मनमानी कारभार व पक्षश्रेष्ठींच्या सूचनांकडे केलेले दुर्लक्ष अंगलट येत असल्याचे दिसत आहे. आता सक्षम पर्यायी नेतृत्त्व मिळताच पक्षाने त्यांचे पंख छाटण्यास सुरुवात केली आहे.
२०१४ मध्ये सत्ता मिळाल्यानंतर पक्षाने आमदार विजयकुमार देशमुख यांना आरोग्य, परिवहन, कामगार कल्याण मंत्रीपदासह जिल्ह्याचे ‘पालकत्व’ सोपवले होते. तर आमदार सुभाष देशमुख यांना सहकार, मदत व पुनर्वसन मंत्रिपद दिले होते.शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विकासासह पक्षाची पाळेमुळे रुजावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनाही ताकद दिली. मात्र, दोघांनी या ताकदीचा सर्वाधिक वापर केवळ शहरातील गटबाजीतच खर्ची घातला.पक्ष कार्यकर्त्यांसह जनतेतूनही ओरड होत असताना त्यांनी पक्ष व महापालिकेची देशमुखी कोणाकडे यासाठी डाव-प्रतिडाव टाकत राहिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड