
बीड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। ग्रामीण भागातील जनतेच्या हक्काच्या संस्था म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी तत्पर असावे, असे आवाहन माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केले.माजलगाव येथील बैठकीत ते बोलत होते.
दीर्घकाळ रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आता समीप आहेत.या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज माजलगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. बैठकीस आ. विजयसिंह पंडित आणि राजेश्वर आबा चव्हाण (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, बीड) उपस्थित होते.
ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. नव्या नेतृत्वाची जडणघडण याच संस्थांमधून होत आली आहे. राजकीय प्रवासाची सुरूवातही पंचायत समितीतूनच झाली होती, ही बाब विशेषत्वाने त्यांनी नमूद केली.
पंचायत समितीतून काम करताना ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न आणि त्यांचे बारकावे जवळून समजले. आमदार झाल्यानंतरही या प्रश्नांसाठी विधानसभेत सातत्याने आवाज उठवता आला हा अनुभव आहे.
मागील वेळी प्रमाणेच माजलगाव तालुक्यातील ६ जिल्हा परिषद आणि १२ पंचायत समिती सदस्य पुन्हा विजयी करून इतिहासाची पुनरावृत्ती करू, असा निर्धार यावेळी केला.
कामांची ताकद आणि जनतेचा विश्वास यांच्या बळावर या दोन्ही निवडणुका जिंकण्यासाठी आपण सर्वांनी अधिक जोमाने मैदानात उतरूया. एकजुटीने कामाला लागूया.असे आवाहन त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis