सीसीआयची कापूस खरेदी झालीच नाही, शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांना कापूस विक्री!
अकोला, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे अकोला जिल्ह्यातील कापसाचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्यातच भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) यंदा 15 ऑक्टोबरपासून
प


अकोला, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे अकोला जिल्ह्यातील कापसाचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्यातच भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) यंदा 15 ऑक्टोबरपासून कापूस खरेदी सुरू करण्याची घोषणा केली खरी, मात्र अद्याप अकोला जिल्ह्यात एकही खरेदी केंद्र कार्यान्वित झालेले नाही. परिणामी, शेतकऱ्यांना पहिल्याच वेचणीतील कापूस खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

सततच्या पावसाने कपाशीचे नुकसान झाले असून, कापसाचा हंगाम लांबणीवर गेला. दिवाळीच्या दिवशीही नवीन कापूस दिसला नाही. कीड व रोगांमुळे कपाशीच्या बोंडांची गळती झाली. लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला. त्यातच शासनाने आयात शुल्क कमी केल्याने कापसाच्या दरास मोठा फटका बसला आहे. काही भागांत पावसाने पहिल्या वेचणीचा कापूस भिजला. त्यामुळे प्रतवारी खराब होऊन दरात घसरण झालेली आहे. चालू हंगामा साठी कापसासाठी केंद्र सरकारने 7 हजार 710 रुपये प्रतिक्विंटल इतका हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, सध्या बाजारात यापेक्षा कमी म्हणजेच 6000 ते 6300 रुपये दर मिळत आहे. कपाशी उत्पादनाचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. बियाणे, खते, कीटकनाशके मशागत, रासायनिक खते व मजुरीचा खर्च वाढल्याने उत्पादन खर्च वाढला. त्या तुलनेत भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande