
अकोला, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।
नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी ‘चला जाणूया नदीला’ ही मोहिम अत्यंत महत्वपूर्ण आहे. मोहिमेच्या निकषांप्रमाणे निवड, नियोजन व प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, सर्व यंत्रणांप्रमाणेच स्वयंसेवी संस्था, तसेच अधिकाधिक लोकसहभाग मिळवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.
अभियानाच्या अनुषंगाने नियोजन व कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, सहायक वनसंरक्षक नम्रता ताले, तसेच वन विभाग, नियोजन विभाग आदी विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, नद्यांतील प्रदूषण, अतिक्रमण, उपसा आदी रोखून पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने हे काम अत्यंत महत्वपूर्ण असल्याने त्यादृष्टीने जिल्ह्यात कार्यवाहीला वेग द्यावा. अभियानाच्या अनुषंगाने कामांच्या मान्यता व यापुढील नियोजन आदी कार्यवाहीची पूर्तता करून घ्यावी. आवश्यक कामांसाठी निधी मिळवून देण्यात येईल.
अभियानात नदी संवाद यात्रा, नदीसाक्षरता वाढविणे, नदीचा तट, प्रवाह, जैवविविधतेबाबत जागृती, नदीखो-यांचे नकाशे, पूररेषा, पाणलोट क्षेत्राचे नकाशे, मातीचे क्षरण, पूर व दुष्काळ, तसेच अतिक्रमण, शोषण व प्रदूषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास व त्याचा परिणाम तपासणे आदी कामे अपेक्षित आहेत. त्यादृष्टीने यंत्रणांनी या कामांना वेग देण्याची सूचना जिल्हाधिका-यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे