
अमरावती, 29 ऑक्टोबर (हिं.स.) | अमरावतीतील चपराशीपूरा येथील वनविभागाच्या २२,००० चौ. फुट जागेवर उभारण्यात आलेला ऑक्सीजन पार्क आज मनपा कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबला जात आहे. तब्बल ९० लाख रुपये खर्च करून माजी पालकमंत्री डॉ. सुनिल देशमुख यांच्या प्रयत्नातून उभारलेला हा पार्क नागरीकांसाठी शुद्ध हवेचा श्वास ठरला होता. परंतु अलीकडे मनपाच्या खाजगी कंत्राटदारांकडून शहरातील केरकचरा पार्कसमोरील व लगतच्या रस्त्यांवर टाकला जात आहे.
काँग्रेस नगर नाल्यावरील पुलापासून गजानन महाराज शाळेजवळील रस्त्यापर्यंत कचऱ्याचे ढीग साचले असून रस्त्याच्या मधोमध कचरा आल्याने वाहनधारकांना अडचण निर्माण होत आहे आणि अपघाताचा धोका वाढला आहे. काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांच्या निर्देशानंतर कचरा उचलण्यात आला होता, मात्र आता स्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. या कचर्यामुळे प्रवासी आणि नागरिक नाराजी व्यक्त करत असून, ऑक्सीजन पार्कच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.वरील वस्तुस्थिती लक्षात घेता, कृपया या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन पुढील तीन दिवसांत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, ही नम्र विनंती. अन्यथा, या परिसरातील नागरिकांना नाईलाजास्तव मनपा मुख्यालयात आपल्या दालनात बैठा सत्याग्रह करावा लागेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस किशोर बोरकर यांनी दिलेला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी