
छत्रपती संभाजीनगर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।
फुलंब्री मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेती वीजपुरवठ्याबाबत येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली. भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. बैठकीत प्रामुख्याने डी.पी.क्षमतेचा प्रश्न, वीजपुरवठ्याची सातत्यता आणि शेतकऱ्यांना होणारा त्रास, या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांना पुरेसा आणि स्थिर वीजपुरवठा मिळावा, यासाठी ६३ के.व्ही. डी.पी. ऐवजी १०० के.व्ही. क्षमतेचे डी.पी. बसवण्यात यावेत, जेणेकरून तांत्रिक अडचणी कमी होतील आणि शेतीसाठी अखंड वीज उपलब्ध राहील, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तसेच प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून सर्व प्रश्न मार्गी लावावेत, असेही निर्देश देण्यात आले.
याप्रसंगी अधीक्षक अभियंता श्री.संदीप दरवडे, कार्यकारी अभियंता श्री.भूषण पाहुरकर, कार्यकारी अभियंता श्री.शैलेश कलंत्री, उपअभियंता श्री.वाहुळ, श्री.पवार, श्री.साळुंके, भाजपा मंडळ अध्यक्ष श्री.गोपाल वाघ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis