गडचिरोलीत ६ नोव्हेंबरला महिला आयोग आपल्या दारी
गडचिरोली, 29 ऑक्टोबर (हिं.स.) महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ''महिला आयोग आपल्या दारी'' या उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्हयात गुरुवार दि. ६ नोव्हेंबर रोजी जनसुनावणी होणार असून, आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. नियोज
गडचिरोलीत ६ नोव्हेंबरला महिला आयोग आपल्या दारी


गडचिरोली, 29 ऑक्टोबर (हिं.स.)

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्हयात गुरुवार दि. ६ नोव्हेंबर रोजी जनसुनावणी होणार असून, आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या जनसुनावणीस महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन चाकणकर यांनी केले आहे.

महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी चाकणकर दि. ६ नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्हयात असणार आहेत. यावेळी जिल्हास्तरावरील जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रशासन, पोलीस, कामगार, परिवहन, आरोग्य, शिक्षण आदी विभागांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, 'महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपर्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणा-या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग करत आहे, असे त्यांनी सांगितले.

दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणेचा आढावा

महिला आयोगाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला. जिल्ह्यातील महिलांशी संबंधित प्रलंबित तक्रारी व प्रकरणे तातडीने निकाली काढून तक्रार निवारणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सर्व विभागांनी समन्वय साधून महिलांच्या न्यायनिवाड्यासाठी प्रभावी आणि संवेदनशील पद्धतीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी नमूद केले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे तसेच इतर संबंधित अधिकारी दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande