
रत्नागिरी, 30 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरीत येत्या ३ नोव्हेंबर रोजी गौरव गाथा संविधानाची हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
यंदाचे वर्ष भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमातून संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जाणार आहे. त्यानिमित्ताने कलाकारांना व्यासपीठ मिळणार आहे. रत्नागिरीतही स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात येत्या ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा ते १० या वेळेत गौरव गाथा संविधानाची हा कार्यक्रम होईल. तसेच ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्याच वेळेत जागर संविधानाचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
“गौरव गाथा संविधानाची” आणि “जागर संविधानाचा” या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार यांची असून या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. रसिकांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी