
नंदुरबार, 31 ऑक्टोबर (हिं.स.) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आज नंदुरबार शहरात पोलीस
विभागाच्या वतीने “एक भारत, श्रेष्ठ भारत” या घोषवाक्याखाली भव्य एकता दौड आयोजित करण्यात
आली. या दौडीमध्ये शेकडो नागरिक, पोलीस अधिकारी-कर्मचारी, महिला, विद्यार्थी, खेळाडू तसेच विविध
शासकीय विभागांचे अधिकारी उत्साहाने सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी उपस्थितांना एकतेची शपथ देत “एकता
दौड”ला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अप्पर
पोलीस अधीक्षक आशीष कांबळे, निवासी जिल्हाधिकारी कल्पना ठुबे, उपविभागीय पोलीस अधिकारी
संजय महाजन आणि इतर अधिकारी यांच्यासह नागरिकांनी उत्साहात दौड सुरु केली.
नेहरू पुतळ्यापासून धुळे चौफुलीमार्गे परत नेहरू पुतळ्यावर संपलेल्या या दौडीत धावपटूंनी पाच
किलोमीटर अंतर पार करत एकतेचा, देशभक्तीचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. दौडीदरम्यान
शहरात “भारत माता की जय”, “एक भारत-श्रेष्ठ भारत” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले.
नागरिकांनी मार्गावर उभे राहून सहभागींचे फुलांनी स्वागत केले.
दौड संपल्यानंतर शिरीषकुमार मेहता उद्यानात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला
पुष्पांजली अर्पण करून लोहपुरुषांना अभिवादन करण्यात आले. या वेळी सहभागींच्या चेहऱ्यावर देशप्रेम
आणि अभिमान झळकत होता. दौड पूर्ण केलेल्या पहिल्या पाच पुरुष व महिला स्पर्धकांना मेडल देऊन
सन्मानित करण्यात आले. यावेळी केवळ नऊ वर्षांचा कार्तीक खेडकर या बालधावपटूने सहभागी होऊन
सर्वांची मने जिंकली. त्याला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
या उपक्रमात वयोवृद्ध नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी, तसेच पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी
यांचा मोठा सहभाग राहिला. संपूर्ण शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. सकाळच्या थंडगार
वातावरणात नागरिकांनी राष्ट्रीय एकता दिन साजरा करत देशभक्तीचा नारा दिला. दरम्यान, जिल्ह्यातील
सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध ठिकाणी अशाच प्रकारे एकता दौड आयोजित करण्यात आली. या
माध्यमातून सरदार पटेल यांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना अभिव्यक्ती देत समाजात एकजुटीचा
आणि राष्ट्रीय अभिमानाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर