
लातूर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।राज्य सरकारचा हा जीआर म्हणजे निव्वळ शब्दांची चलाखी आहे. कर्जमाफी करा, अशी आमची सर्वांची आणि संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांची मागणी आहे. असे असताना सरकारने काढलेल्या जीआर मध्ये कुठेही यंदाच्या कर्जमाफी बद्दलचा उल्लेख केला नाही. अशी टीका लातूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे
यासंदर्भात बोलताना माजी आमदार धीरज देशमुख म्हणाले की,कर्जाच्या विळख्यातून शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण हा निर्णय घेताना ’आम्ही कर्जमाफी करणार’ असे सरकारने स्पष्टपणे यात नमूद केलेले नाही. यावरून सरकारच्या मनात नेमके काय आहे, हे स्पष्ट होते.
सत्ता येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे आश्वासन महायुतीने दिले होते. सध्या राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे दिलेले आश्वासन पूर्ण करून सरकारने शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी आमची मागणी आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis