
परभणी, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
“आधुनिक भारताचे शिल्पकार” आणि भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारताच्या कणखर व दूरदर्शी नेत्या स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी भगवानराव वाघमारे, किशनराव उर्फ बंडू पाचलिंग, अमोल जाधव, गौस बागवान, श्रीराम जाधव, वैजनाथ देवकते आणि दिगंबर खरवडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात सरदार पटेल यांच्या राष्ट्र एकात्मतेच्या कार्याचा उल्लेख करत, त्यांच्या जयंतीनिमित्त भारताच्या एकतेचा संदेश देण्यात आला. तसेच स्व. इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाची आणि दूरदृष्टीची आठवण करून देण्यात आली.
यावेळी “स्व. इंदिरा गांधी यांनी देशातील 29 खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून अर्थव्यवस्थेला बळकटी दिली, राजे-महाराजांच्या तनख्वा बंद केल्या, भूमीहीनांना गायरान जमिनींचे चार एकर मालकीहक्क पट्टे वाटप करून मागासवर्गीयांना स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनवले. तसेच जागतिक इतिहासात नोंद राहील असे पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेशाची निर्मिती केली.”
या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक न्याय, समानता आणि राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis