बीड, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। गेवराई तालुक्याचे माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार , दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. शिवनगरी, र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ (नाना) बागडे, श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज, श्रीक्षेत्र चाकरवाडी संस्थानचे महंत ह.भ.प. महादेव महाराज, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. राजन पाटील यांच्या शुभहस्ते शिवाजीराव पंडित यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार असून यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीने केले आहे.
गेवराई तालुक्याचे भाग्यविधाते आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणातील भिष्माचार्य म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, दि.३ ऑक्टोबर पासून गेवराई शहरात श्रीमद् भागवत कथा आणि भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भावरत्न समाधान महाराज शर्मा यांच्या मधूर वाणीतून सुरु असलेल्या भागवत कथेमुळे गेवराईचे वातावरण भक्तिमय झाले आहे. अनेक नामांकित किर्तनकारांची सेवा सप्ताहभर सुरु आहे.
शुक्रवार दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ (नाना) बागडे यांच्या हस्ते माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांचा अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. यावेळी श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.शिवाजी महाराज, श्री क्षेत्र चाकरवाडीचे ह.भ.प. महादेव महाराज यांच्यासह साधु, संत-महंत आणि गेवराई तालुक्यातील वारकरी सांप्रदायात काम करणारे किर्तनकार, गायक, वादक यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात गेवराई विधानसभा मतदार संघातील सर्व साधु, संत-महंत, किर्तनकार यांचाही हृदय सत्कार अभिष्टचिंतन सोहळा समितीच्यावतीने करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त होणाऱ्या भव्य सत्कार समारंभानंतर ह.भ.प.शिवाजी महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसाद वाटप केला जाणार आहे भाविक भक्तांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही आयोजन समितीने केले आहे.
शिवाजीराव पंडित आणि शिवछत्र परिवारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून किर्तन महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले आहे. र.भ.आट्टल महाविद्यालयाच्या मैदानावर उभारलेल्या शिवनगरीत गेल्या सप्ताहभर सुरु असलेल्या किर्तन महोत्सवाला भाविक भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. याप्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis