पुणे, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।
पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळामुळे त्या परिसरातील जमिनींना सोन्याचे दर मिळू लागल्याने काही जणांनी बनावट कागदपत्रे तयार करून जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रस्तावित विमानतळ परिसरातील मागील पाच वर्षांतील सर्व जमीन व्यवहारांची तपासणी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. या तपासणीत आढळणाऱ्या दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी या सात गावांच्या सुमारे तीन हजार एकर जमिनीवर विमानतळ होणार आहे. सध्या जमिनींची मोजणी सुरू असून १७ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बनावट दस्तऐवजांच्या आधारे जमिनींची खरेदी-विक्री झाल्याने एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला.तसेच अशा प्रकारच्या तीन तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या असून, आणखी काही प्रकरणे आहेत का? याचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये काही महसूल अधिकाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी डुडी यांनी या बाबीची गंभीर दखल घेतली असून, कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु