चंद्रपूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागाचा आढावा घेतला. यावेळी बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उप प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्या आदी उपस्थित होते.
याप्रसंगी राज्यमंत्री नाईक म्हणाले, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग कामे देत नसल्याच्या ब-याच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना काम देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अभियंत्यांना नियमानुसार कामे द्यावीत. तसेच चंद्रपूरमध्ये रस्त्यांची कामे अर्धवट असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. प्राधान्याने रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवावीत.
आदिवासी विकास विभागाने लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार पात्र उमेदवारांना त्वरीत नियुक्ती द्यावी. याबाबत कोणतीही टाळाटाळ करू नये. चंद्रपूर हा उद्योगांचा जिल्हा आहे. उद्योजकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या प्राधान्याने सोडवाव्यात. तसेच स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्याचे धोरण ठेवावे, अशा सुचना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव