परिवर्तनवादी व्यक्तींचा इतिहास विसरू नका - देवेंद्र फडणवीस
अनसूयाबाई काळे स्मृती सदनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन नागपूर, 15 नोव्हेंबर (हिं.स.) : “आपला समाज इतिहास विसरतो आणि त्याचाच परिणाम म्हणून कधी काळी आपल्याला गुलामगिरीत जावे लागले. त्यामुळे परिवर्तनवादी व्यक्तींचा इतिहास विसरू नका,” असे आवाहन
अनसूयाबाई काळे स्मृती सदनाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


अनसूयाबाई काळे स्मृती सदनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर, 15 नोव्हेंबर (हिं.स.) : “आपला समाज इतिहास विसरतो आणि त्याचाच परिणाम म्हणून कधी काळी आपल्याला गुलामगिरीत जावे लागले. त्यामुळे परिवर्तनवादी व्यक्तींचा इतिहास विसरू नका,” असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उत्तर अंबाझरी मार्गावरील अनसूयाबाई काळे स्मृती सदन तसेच पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या वर्किंग वूमन अँड गर्ल्स होस्टेल या नूतनीकरण झालेल्या वास्तूंचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडले.या प्रसंगी एँम्परसँड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रुस्तम केरावाला अतिथी म्हणून उपस्थित होते.

अनसूयाबाईंचा लढा परिवर्तनासाठी

याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,

जातीयतेविरोधातील लढ्यात आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या अनसूयाबाई काळे यांनी महिलांच्या उत्थानासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे.

“देशाच्या पहिल्या संसदेत त्यांनी नागपूरचे प्रतिनिधित्व केले. महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाच्या लढ्यातील त्यांचा आवाज हा हक्काचा आवाज होता,” असे त्यांनी सांगितले.

अनसूयाबाईंचे विचार, लेखन व कार्य पुरोगामी स्वरूपाचे असून त्यात सुधारणावादाची दिशा स्पष्ट दिसते.“नागपूरने अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वे पाहिली, त्यापैकी एक म्हणून अनसूयाबाई कायम स्मरणात राहतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.कार्यक्रमाच्या प्रारंभी काळे फाऊंडेशन ट्रस्टचे विश्वस्त विलास काळे यांनी अनसूयाबाईंच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.व्यासपीठावर एआयडब्ल्यूसीच्या माजी अध्यक्ष शीला काकडे, पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या अध्यक्ष नीलिमा शुक्ला, सचिव नीला कर्णिक उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे संचालन सरिता कौशिक यांनी केले तर आभार अनसूया काळे-छाबरानी यांनी मानले.

कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.

लहानपणापासून मी ही इमारत पाहत आलो आहे. नाटकाच्या प्रॅक्टिससाठीही येथे येत असे. अलीकडे इमारतीची अवस्था खराब झाली होती, त्यामुळे नूतनीकरणाच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी दिल्याची आठवण त्यांनी सांगितली.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande