
पुणे, 15 नोव्हेंबर, (हिं.स.)। नवले पुलावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करूनही त्याचे प्रमाण कमी होत नाही. या पुलाजवळील तीव्र उताराचा भाग कमी करणे शक्य नाही. त्यावर दोन पर्याय पुढे आले आहेत. त्यापैकी ‘एमएसआरडीसी’ने हाती घेतलेल्या पश्चिम भागातील उर्से ते शिवरे या टप्प्यातील रिंगरोडमधील शिवरे ते कासार अंबोली यादरम्यान २२ ते २५ किलोमीटर रस्त्याचे काम एक वर्षात पूर्ण करणे, हा पर्याय असून त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
२०२२ मध्ये रस्ता सुरक्षा समितीने नवले पुलाजवळील अपघात कमी करण्यासाठी विविध उपयोजना सुचविल्या होत्या. त्या सर्व उपयोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. साताऱ्याकडून येताना नवले पुलाजवळ तीव्र उतार आहे. तो कसा कमी करता येईल, यावर दोन दिवसांपूर्वीच चर्चा झाली होती. परंतु, तो कमी करणे शक्य नाही, असे महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु