
पुणे, 16 नोव्हेंबर (हिं.स.)पुणे-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर होणारे गंभीर अपघात रोखण्यासाठी नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल दरम्यान असलेल्या आठ किलोमीटरच्या अंतरात अवजड वाहनांची वेगमर्यादा प्रतितास ६० किलोमीटरवरून ४० किलोमीटर एवढी करण्यात आली आहे. वेगमर्यादा निश्चित केल्यानंतर अवजड वाहनचालकांकडून सर्रास नियम धुडकावून लावले जात असल्याचे दिसून आले आहे.नवले पुलावर साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. या कंटेनरने १० ते १२ वाहनांना धडक दिल्याने लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातात नऊ ते दहा जण गंभीररित्या जखमी झाले. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात घडलेल्या गंभीर स्वरूपाचे अपघात यापूर्वी घडले आहे. बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल परिसर आठ किलोमीटर अंतर तीव्र उताराचे आहे. त्यामुळे या भागात भरधाव अवजड वाहनांचे ब्रेक निकामी होऊन गंभीर अपघात घडले आहेत. नवले पूल परिसरात झालेल्या गंभीर अपघातांची दखल घेऊन वाहतूक पोलिस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिकेने एकत्र येऊन या भागातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. नवले पूल परिसरात झालेल्या अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु