
मुंबई, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। बदलापूर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कार्यान्वयनाची जबाबदारी आता कुळगाव बदलापूर नगरपरिषदेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नगर विकास विभागाने जारी केला असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
नगरविकास विभागाने यापूर्वी २३ मे २०२५ रोजी या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता प्रदान केली होती. त्यानुसार प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यान्वयन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे.
या निर्णयानुसार, “कुळगाव बदलापूर नगरपरिषद” यांच्याऐवजी “महाराष्ट्र जीवन प्राधिकरण” ही कार्यान्वयन संस्था म्हणून काम पाहणार आहे. तसेच प्रकल्पातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार, या बदलामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळेल आणि बदलापूर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सुदृढ होईल, असे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule