
मुंबई, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक अनुषंगाने जिल्हानिहाय बैठका सोमवारपासून वरळी डोम येथे सुरू झाल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
सोमवारी मराठवाडा आणि कोकणातील सिंधुदुर्ग या जिल्हयांची आढावा बैठक पार पडली तर आज (मंगळवारी) धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, अहिल्यानगर या जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्यासह वरील जिल्हयातील पक्षाचे विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद सदस्य, माजी खासदार, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतमधील राजकीय परिस्थिती आज जाणून घेतली. महायुतीमधील एकंदरीत समन्वय आणि भविष्यात काय करायचे यासंदर्भात ठोस भूमिका सांगण्यात आली. आज निवडणूक आयोगाने नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला वेग देण्याचे सूचित केलेले आहे. बर्याच ठिकाणी संपर्कमंत्री व पालकमंत्री नेमलेले आहेत ते उद्यापासून त्या त्या जिल्ह्यात जातील. पक्षाच्या बैठका घेतील. यावेळी त्यांना महायुतीमध्ये समन्वय करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली.
आज (मंगळवारी) महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या समन्वय समितीची बैठक होणार त्यामध्ये याबाबत सारासार चर्चा होणार आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हानिहाय आढावा बैठक सोमवारपासून वरळी डोम येथे सुरू झाली आहे. या बैठका शुक्रवारपर्यंत चालणार आहेत. सोमवारी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सुनिल तटकरे यांनी काही जिल्ह्यातील मोजक्या कार्यकर्त्यांनी निधीबाबत मुद्दा उपस्थित केला होता. यामध्ये कुणाचीही गंभीर तक्रार नव्हती त्याचवेळी त्यांचे समाधान आम्ही केले होते असे आज माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना स्पष्ट केले.
स्वबळाचा नारा सर्व ठिकाणी दिला गेला असे काही नाही. निवडणुकीत नगरपालिका व नगरपंचायत विभागात वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे. तिथल्या शहर अध्यक्षांनी आणि प्रमुखांनी आम्हाला त्याबद्दल अवगत केले आहे. आमची स्पष्टपणाची भूमिका आहे. महायुतीमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा. संपर्कमंत्री आणि पालकमंत्री आम्हाला याबाबत माहिती देतील. त्यानंतर आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
विरोधकांनी काय भूमिका घ्यावी तो विरोधकांचा प्रश्न आहे. शेवटी दूबार मतदारांची नोंदणी जर का असेल तर मतदान करत असताना एकदाच मतदान करता येते. प्रत्येक बुथनिहाय मतदानकेंद्रनिहाय प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी त्याठिकाणी असतात. त्यामुळे असे वाटते की काहीवेळ त्यावेळी दूबार मतदान होतेच असा भाग नाही. त्यावेळी खबरदारी प्रत्येक राजकीय पक्षाला घेता येऊ शकते. दिर्घकाळानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्यामुळे कुठल्याही पद्धतीची सबब न सांगता लोकशाहीच्या माध्यमातून विरोधकांनीही या निवडणूकांना सामोरे जावे असे आवाहन सुनिल तटकरे यांनी विरोधकांना केले आहे.
मतदान केंद्रामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रतिनिधी असतो. तो याबाबत खबरदारी घेण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे या विषयावर पुन्हा - पुन्हा चर्चा करण्यापेक्षा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यावेळी जी काही सतर्कता दाखवायची आहे ती राजकीय पक्षांनी दाखवली तर या विषयावरील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे मिळू शकेल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
प्रत्येक नगरपालिकानिहाय वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे. आम्हालाही सन्मानपूर्वक जागा मिळणे आवश्यक आहे आणि आम्ही जिथे ताकदवान आहोत तिथे आमच्या सहकारी पक्षांना सन्मानपूर्वक जागा मिळणे आवश्यक आहे. मात्र चर्चेअंती यावर योग्य निर्णय होईल हेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर