
मुंबई, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)।राहुल गांधींचे हे 'वेडेपण' आहे. त्यांनी आधी महाराष्ट्रातील मतदार याद्यांचा अभ्यास करावा. दुबार नावे असणे हा काही नवीन प्रकार नाही, तो संपूर्ण राज्यात आहे. कामठीत माझ्याविरुद्ध लढलेल्या काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश भोयर यांचेच नाव दुबार आहे, हे राहुल गांधींना दिसत नाही का? असा टोला लगावत बावनकुळे यांनी राहूल गांधींच्या आरोपाचा समाचार घेतला.
बावनकुळे म्हणाले दुबार नाव असले तरी मतदान एकच व्यक्ती करते, कारण शाई लावली जाते. जी मतदारयादी वापरून महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले, तीच यादी आता विधानसभेत पराभव झाल्यावर चुकीची कशी ठरू शकते? नगरपालिका निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने हा 'फेक नरेटिव्ह' पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.
उद्धव ठाकरे 'विना पेनाचे' मुख्यमंत्री
मंत्री बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. मी माझ्या २२ वर्षांच्या कारकीर्दीत अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण उद्धव ठाकरे हे 'विना पेनाचे' मुख्यमंत्री होते. त्यांच्या खिशाला कधीच पेन नसायचा. ते आमदारांच्या पत्रांवर तीन-तीन महिने सह्या करत नव्हते, म्हणूनच त्यांचे आमदार त्यांना सोडून गेले. अडीच वर्षांच्या काळात ते अडीच दिवस मंत्रालयात आले, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर