
मुंबई , 10 डिसेंबर (हिं.स.)। देशात शांतीचे वातावरण असेल तरच समाजाची प्रगती शक्य होते. आपल्या देशाची तिन्ही सैन्य दलं अत्यंत सक्षम आहेत आणि त्यामुळेच आपले सैनिक व अधिकारी हे सर्वोच्च सन्मानास पात्र आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी काढले.
सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे आयोजित सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा आज लोकभवन, राजभवन, मुंबई येथे केला. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
ध्वज निधी संकलनासाठी उत्तम कार्य केलेल्या अधिकाऱ्यांना राज्यपाल यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
राज्यपाल म्हणाले की, भारतीय सशस्त्र सेना ही देशाचे गौरव, प्रतिष्ठा आणि सन्मान यांचे प्रतीक आहे. सैनिक देशाच्या सीमांचे संरक्षण करतात, त्यासाठी त्यांना अपार धैर्याने उभे राहावे लागते. सीमा रक्षण करताना त्यांना वीरमरण येते किंवा अपंगत्व येते. अशा परिस्थितीत त्यांच्या पुनर्वसनाला साथ देणे हे प्रत्येक भारतीयाचे नैतिक कर्तव्य आहे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
ते पुढे म्हणाले की, सशस्त्र दल फक्त सीमा राखत नाही, तर नैसर्गिक आपत्ती आणि आपत्कालीन प्रसंगी नागरिकांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून येते. सैनिक असल्याचा नागरिकांना जो विश्वास आहे, तोच राष्ट्राच्या सुरक्षिततेचा पाया आहे.
प्रमुख सेना अधिकारी, सेवेत असलेले आणि निवृत्त अधिकारी यांचे शौर्य आणि हिम्मत ही प्रेरणादायी आहे. सामान्य नागरिक सेनाच्या प्रती असलेल्या योगदानासाठी उत्तरदायित्व ओळखतात आणि निधी संकलनासाठी सहभाग नोंदवतात. सैन्याच्या बलिदान, त्याग, शौर्यासाठी भारतीय नतमस्तक होतात. असे गौरोद्गारही राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी तिन्ही दलांच्या सन्मानार्थ काढले.
जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणाले की, सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त संकलित निधी शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, लढाईत जखमी/अपंग झालेल्या सैनिकांचे पुनर्वसन, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणकारी योजना, सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत, सैनिक कल्याण बोर्डाच्या विविध उपक्रमांना निधी देण्यासाठी ध्वज संकलन केले जाते.
तर निधी संकलनासाठी योगदान दिलेल्या सर्व सैनिक, सैनिकी कुटूंब, नागरिक, शाळा, संस्था यांचे मुंबई शहरचे जिल्हाधिकारी अंचल गोयल यांनी आभार मानले.
यावेळी निधी संकलनासाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या कोकण विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी अंचल गोयल, छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज अशीया, अमरावतीचे जिल्हाधिकारी अशीष येरेकर, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, उपविभागीय अधिकारी प्रशांत डागे, जिल्हा प्रकल्प अधिकारी संजयकुमार शिंदे, उपआयुक्त, MCGM (कांदिवली विभाग) संजय खुराडे, तहसीलदार, बोरिवली इरेश चापलवार तहसीलदार, तहसिलदार अंधेरी स्नेहलता स्वामी, प्रशासन अधिकारी किसन केकरे, शिक्षण निरीक्षक, उत्तर विभाग (चेंबूर) मुश्ताक शेख, शिक्षण निरीक्षक, पश्चिम विभाग (जोगेश्वरी) संजय जावीर, संयुक्त जिल्हा निबंधक, मुंबई उपनगर रमेश पगार, अधीक्षक, उत्पादन शुल्क निलेश सांगडे, उपआयुक्त, GST विभाग मजगाव संतोषकुमार राजपूत, प्रादेशिक परिवहन अधिकारी भारत काळसकर, संचालक, अन्न व नागरी पुरवठा नियंत्रक चंद्रकांत डांगे, जिल्हा उपनिबंधक, सहकार विभाग नितीन काले, सहाय्यक आयुक्त, सामाजिक कल्याण रविकिरण पाटील, संयुक्त जिल्हा निबंधक भरत गरुड, शिक्षण निरीक्षक, दक्षिण विभाग वैशाली वीर यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर