
कोल्हापूर, 3 डिसेंबर (हिं.स.)। बाल विवाह मुक्त महाराष्ट्र आपला संकल्प अभियान 15 ऑक्टोंबर ते 26 जानेवारी या कालावधीत जिल्हयामध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये मोठया प्रमाण जनजागृती करून बाल विवाह मुक्त कोल्हापूर जिल्हा करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
यामध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन 1098, आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था, इचलकरंजी, अवनी संस्था, कोल्हापूर मार्फत मोठया प्रमाण बाल विवाह मुक्त कोल्हापूर जिल्हा करण्याकरता कार्यक्रम घेण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व भागधारकांची बैठक संपन्न झाली.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगीतले की समुदाय स्तरावरून जनजागृती, बाल महोत्सव, क्षमता वृध्दी कार्यशाळा / प्रशिक्षण, स्त्री मुक्ती दिन दिवशी रॅली, प्रचार प्रसिध्दी, जिंगल बेल्स इ. कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्याचबरोबर बाल विवाह होवू नये याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामीण साठी ग्रामसेवक तर शहरीसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची आहे. तसेच तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका बाल संरक्षण समिती यांनी तालुक्यातील गावांचा आढावा घेऊन तालुका बाल विवाह मुक्त करावा याबाबत 26 जानेवारी रोजी उत्कृष्ठ गाव व तालुक्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा बाल विवाह मुक्त करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. शासनाने विवाहाचे वय हे निश्चित केले असून मुलीचे वय 18 व मुलांचे 21 वर्ष आहे. मात्र तरी सुध्दा बाल विवाह होत असल्याचे निर्दशनास येत आहे. बाल विवाह केल्यास बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार दोन लाख रूपये दंड किंवा 5 वर्ष सक्त मजुरी किंवा दोन्ही शिक्षा होवू शकतात.
त्याचप्रमाणे प्रिटींग प्रेस, मंगल कार्यालय, वाजंत्री, लग्न लावणारे पौरोहित्य करणारे व लग्न सोहळयामध्ये सहभागी होणारी मंडळी यांच्यावरही गुन्हे दाखल केले जातील. गावातील सरपंच, पोलीस पाटील व ग्रामसेवक यांनी गावामध्ये बालविवाह होणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी. ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार ग्रामीण भागाकरीता बाल विवाह प्रतिबंध अधिकारी असून शहरी भागाकरीता बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) हे आहेत. सरपंच हे ग्राम बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष असून पोलीस पाटील हे गाव व पोलीस स्टेशन यांना जोडणारा मुख्य दुवा आहे. सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी गावात कोणाचा विवाह ठरल्यास त्या मुला मुलीच्या वयाची खात्री करावी. जेणे करून गावात बाल विवाह होणार नाही व कोल्हापूर जिल्हा हा बाल विवाह मुक्त जिल्हा होईल अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar